मुंबई – भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अद्यापही कोव्हॅक्सिन लशीला मान्यता दिली नसल्यामुळे ही लस घेणाऱ्या भारतीय नाविकांच्या अमेरिका, युरोप आणि आखाती राष्ट्रांतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. नाविक आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवर रुजू होण्यासाठी दिलेली पत्रे मालवाहतूक आणि प्रवासी जहाज कंपन्या परत घेत आहेत. त्यामुळे देशातील हजारो नाविकांचे भवितव्य संकटात सापडले आहे.
देशातील आणि राज्यातील अनेकजण परदेशातील जहाजांवर नोकरीला आहेत. गेल्या वर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर जहाजांवर असलेले नाविक मायदेशी परतले.
जागतिक अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यावर नाविकांना पुन्हा कामावर रुजू होण्याची सूचना कंपन्यांनी के ली. मात्र त्यासाठी लशीच्या दोन्ही मात्रा घेण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार अनेकांनी लसीकरण करून घेतले.
यातील काहींनी ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ लसीची मात्रा घेतली. या लसीला अद्यापही जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही.याचा फटका परदेशातील जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय नाविकांना बसला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली लस घेणे कंपन्यांनी बंधनकारक केले असून कोवॅक्सिन घेतलेल्या नाविकांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. एकदा लस घेतल्याने आता कोविशिल्ड लस पुन्हा घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कोवॅक्सिनला मान्यता मिळेपर्यंत कामावर जाता येणार नाही. मात्र तोपर्यंत नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती नाही.