बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील वेलदुर येथे ७.३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी होड्या किनाऱ्यावर आणणे अडचणीचे ठरणार होते. यावर आमदार भास्करराव जाधव यांनी आज संबंधित सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल अशाप्रकारे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष बाबा भालेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी यांनी आमदार जाधव यांची चिपळूण येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रस्तावित जेटीमुळे स्थानिक मच्छीमारांपुढे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली होती. त्यावर आमदार जाधव यांनी तिथूनच संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना दुसऱ्याच दिवशी सकाळी वेलदुर जेटीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे आज सकाळी आमदार जाधव वेलदुर येथे पोहोचले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मोहिते, उप अभियंता मंजुळे, मत्स्य विभागाचे निरीक्षक देसाई, या कामाच्या सल्लागार एजन्सीचे दाभोळकर यांच्यासह अन्य स्थानिक अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. प्रस्तावित शेतीमुळे स्थानिक मच्छिमारांना होड्या उभ्या करणे अडचणीचे ठरणार असल्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकाऱ्यांची सल्लामसलत केली आणि तोडगा काढताना जेटीचे पिलर उभे राहणार आहेत त्याच्या बाहेर अडीच मीटरने रॅम्प वाढविण्याचा आणि २४ मीटर पर्यंत जेटी ठेवून पुढे ४० मीटरचा उतार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आणि त्यांनीही त्या तत्काळ मान्य केल्या.
आमदार जाधव यांनी मच्छीमारांच्या अडचणीवर अवघ्या एका दिवसात मार्ग काढला. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय झाल्यानंतर गावच्या राधाकृष्ण मंदिरामध्ये वेलदूर सहकारी मच्छी व्यवसाय संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी आता पक्ष कुठला हे न पाहता आपलं काम कोण करतो हे पाहून विकास करणाऱ्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका लोकांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले
यावेळी गावचे सरपंच डांगे, अंबाजी दाभोळकर, संदीप वनकर, नंदा रोहिलकर, संतोष माने, जयवंत पडवळ, प्रवीण पड्याळ आदी उपस्थित होते.
जाधव यांची दूरदृष्टी
मुंबई ते गोवा अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र मुंबई ते गोवा दरम्यान या वाहतुकीला कुठेही थांबा देण्यात आला नव्हता. परंतु या सेवेचा फायदा आपल्या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाचा झाला पाहिजे यासाठी आमदार आमदार भास्करराव जाधव यांनी पाठपुरावा केला आणि गुहागरला थांबा मंजूर करून घेतला. त्यासाठी गुहागर तालुक्यातील वेलदूर हे ठिकाण सोयीचे असल्याने तिथे ७.३० कोटींची जेटी मंजूर करून घेतली. त्याबरोबरच प्रवाशांसाठी वेटिंग रूम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, उपहारगृह आणि तिकीट काउंटर असलेल्या इमारतीचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. त्याचीही पाहणीदेखील आज त्यांनी केली. आमदार . जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे ही सेवा उपलब्ध होत असून त्याचा फायदा गुहागरसह आजूबाजूच्या तालुक्यानाही निश्चितपणे होणार आहे. पर्यटनामध्ये वाढ होऊन, रोजगार निर्मितीसुध्दा होऊन त्याचा सर्वाधिक फायदा गुहागर तालुक्याला होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here