शृंगारतळी रस्ता रुंदीकरण ; राजकारण करण्यापेक्षा विकास करुन घ्या – भास्कर जाधव

0
397
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेत वाढविण्यात येणारी रस्त्याची उंची 6 फुटावरुन एक किंवा दीड फूट होणार आहे. तसेच रुंदीकरणाबाबतचे इतर प्रश्नही सोडवावेत, याबाबतच्या सूचना आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी विकासात राजकारण न आणता जो कोणी विकासकामे करील त्याला सहकार्य करा व सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत रस्ता रुंदीकरण व उंचीवरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याबाबत त्या संबंधी शंकांचे निरसन व्हावे यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर-विजापूर महामार्गाचे अधिकारी, संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी, व्यापारी, ग्रामस्थ यांची पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात बैठक झाली. यावेळी गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता शेख, शाखा अभियंता मराठे, सरपंच संजय पवार, ठेकेदार शिवाजी माने, पाटपन्हाळे गावचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, गुहागरचे उपसभापती सुनील पवार, जि.प. सदस्य प्रवीण ओक, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, विनायक मुळ्ये आदी उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अजित बेलवलकर यांनी शृंगारतळी बाजारपेठेत वाढणाऱ्या रस्त्याच्या उंची, रिक्षा स्टँड, प्रवासी निवारा शेड, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था, पाणीपुरवठा करणारी वाहिनी, वीजेचे खांब, अंडरग्राऊंड केबल आदींबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर आमदार जाधव यांनी प्रत्येक प्रश्नांचे निरसन केले. बाजारपेठेतील रस्त्याची उंची 6 फूट आहे ती दीड ते दोन फूट होईल, असे अधिकाऱ्यांसमक्ष सांगितले. बाजारपेठेतील 1.55 कि.मी.ची अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शृंगारतळी शहर रिक्षा संघटनेचे रजिस्ट्रेशन करण्यात येऊन त्यांच्यासाठी रिक्षा स्टँडची व्यवस्था करण्यात येईल. यावेळी आ. जाधव यांनी बैठकीतूनच जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून रिक्षा संघटनेचे रजिस्ट्रेशन होण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. रिक्षावाल्यांना बसण्यासाठी एका बाजूला निवारा शेड करुन देण्यात येईल. रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वीच वीज खांब बदलणे, पाणीपुरवठा करणारी वाहिनी बदलणे ही कामे सुरुवातीला करावीत, अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सद्यस्थितीत रस्त्याशेजारी वर्षानुवर्षे बांगडी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना रस्त्याशेजारी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात येईल, असा शब्द दिला. बस थांबा पक्के हवे की स्टीलचे नवे बांधकाम हवे याबाबत व्यापाऱ्यांनी ठरवून जागा द्यावी.
शृंगारतळी बाजारपेठेजवळील पुलांची सद्यस्थिती रुंदी 10 मीटर आहे ती 16 मीटर होईल. महामार्गाला जोड रस्ते आहेत ते व्यवस्थित करुन दिले जातील. गुहागर ते रामपूर हा रस्ता मंजूर आहे, मात्र उर्वरित रामपूर ते मिरजोळी या रस्त्याला मंजुरी नसून ती मिळविण्यासाठी प्रयत्न करु, असेही आमदार जाधव यांनी आश्वासन दिले. हा महामार्ग मे महिन्यापर्यंत बांधून पूर्ण होईल, असेही सांगितले. यानंतर आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत मोडकाघर पुलाची जागेवर जाऊन पाहणी केली. पाटपन्हाळे नवीन महाविद्यालयाच्या समोरील गडगोबा या देवस्थानची पाहणी करुन हे देवस्थान कसे वाचविता येईल, याबाबत अधिकारी व ठेकेदारांना सूचना केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी त्यांनी ध्रुव एजन्सी नेमणूक केली होती. त्यामध्ये जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना गडकरी यांनी हा रस्ता पूर्णत्वास जाण्यासाठी दोन व्यक्तींची नावे सुचविली होती. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गुहागरचे आमदार भास्कर जाधव या दोन व्यक्तींना भेटण्यास सांगितले होते, याचा आवर्जून आ. जाधव यांनी केला. त्यामुळे हा रस्ता पूर्णत्वास जाण्यास कोणतीच अडचण आता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामपूर व मार्गताम्हाने येथील रुंदीकरणाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील व्यापारी व ग्रामस्थांनी मला संपर्क साधल्यास त्यांचेही प्रश्न मी सोडविणार असल्याचे आ. जाधव यांनी शेवटी सांगितले.

रामपूर ते गुहागर या दरम्यान, गावातील लोकांच्या रस्ता रुंदीकरणाला शासकीय व्यतिरिक्त खासगी जमिन जात आहे, त्यांना नुकसानभरपाई मिळणार असून भरपाईचा एकूण 43 कोटी 95 लाख इतका निधी प्रांताधिकाऱी कार्यालयात जमा झालेला आहे. जमिनमालकांना हा मोबदला रेडीरेकनरच्या चारपट मिळणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here