गुहागर – कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असणारी मंदिरे,प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. याकरता महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अध्यात्मिक भावना व श्रद्धा लक्षात घेऊन मागील दीड-दोन महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात घंटानाद करून जनतेच्या भावना तिघाडी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू होता. त्याला अखेरीस यश आल्याचे यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले.
मार्च महिन्यापासून सुरू झालेला कोरोना महामारी संसर्गाचा विषय आणि त्याला आळा घालण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आयोजित केलेले लॉकडाऊन यामुळे अनेक गोष्टींवर आळा घालण्यात आला तर काही ठिकाणी बंदी घालण्यात आली होती. त्याप्रमाणे कोरोना संसर्ग वाढू नये याकरता सर्व प्रार्थना स्थळे व मंदिरे बंद करण्यात आली. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त – कमी होऊ लागला त्याप्रमाणे काही गोष्टीत सूट देण्यात आली पण या काही गोष्टींमध्ये महाराष्ट्र शासन प्रार्थनास्थळे, मंदिरांचा समावेश करत नव्हते. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होत होत्या. जवळपास वर्षभरातील सर्वच सण हे कोरोना प्रादुर्भावामुळे जनतेला साजरे करता आले नव्हते. यामुळे जनतेच्या भावना व श्रद्धा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने घंटा नाद आंदोलन चालू होते आणि यामुळेच शासनाला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र हा निर्णय घेत असताना मंदिर दीपावलीच्या मुहूर्तावर म्हणजे 14 नोव्हेंबरला जर खुली करण्यात आली असती तर अधिक बरे झाले असते अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. सर्व प्रार्थनास्थळे, सर्व मंदिरे खुली व्हावीत ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा होती. या मंदिरे खुली होण्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचासुद्धा प्रश्न संपणार आहे आणि यासाठीच गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुहागर तालुक्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढ्यांचे वाटप करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शार्दुल भावे,तालुका चिटणीस ज्योतीताई परचुरे,शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश रहाटे, महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा घाडे,शहराध्यक्षा नेहा वराडकर,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजय मालप, जिल्हा कार्यकारणी सदस्य रश्मीताई पालशेतकर, नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समीर घाणेकर, गजाभाऊ वेल्हाळ, अमोल गोखले, अमित जोशी, हेमंत बारटक्के आदीसह बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.