गुहागर – भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने लग्न समारंभात उपस्थितीत संख्येची मान्यता वाढवून देण्याच्या मागणीचे निवेदन गुहागर तहसिलदारांना देण्यात आले.
कोरोना महामारी संसर्गातील लाॅकडाऊन पासून म्हणजेच २२ मार्च २०२० पासून अनेक नियोजित लग्न आजपर्यंत रहित झालेली आहेत. लग्नसमारंभातील संख्येवर बंधन आल्यामुळे पूर्वी २०-२५ तर आता ५० माणसांना परवानगी देण्यात आली आहे. पण यामध्ये एकूण समारंभाचा अंदाज घेतला तर त्यामध्ये भटजी, स्वयंपाकी, स्वयंपाक वाढणारी माणसे, मंडपवाले, स्पीकरवाले, हॉलचे कर्मचारी, यांचाही समावेश होतो. मग वधु- वर यांचेकडील संख्या रहाते फक्त दहा माणसांची. त्यामुळे लग्न समारंभ करणे कठीण होऊन बसले आहे.सध्या देशात, महाराष्ट्रात, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण फारच कमी झाले असून अनेक प्रकारचे जास्त संख्येचे कार्यक्रम होऊ लागलेले आहेत. मात्र लग्न-समारंभासारख्या कार्यक्रमांमधील संख्येवर मर्यादा असल्याने या विधीला विलंब होत आहे. तर हॉल मालक, आचारी, वाढपी, मंडप डेकोरेटर्स, स्पीकर, वाजंत्री,खुर्ची टेबल ही व्यवस्था पुरवणा-यांवरही उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे या सर्वांचा सारासार विचार करून लग्नसमारंभासाठी व यासारख्या तत्सम कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा वाढवून मिळण्यासाठी किंवा एखाद्या हॉलच्या, सार्वजनिक सभागृहाच्या क्षमतेच्या 50% परवानगी मिळण्यासाठी आपल्याकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर,शासनस्तरावर याकरिता आमच्या निवेदनाद्वारे प्रयत्न करावेत अशी संपूर्ण गुहागर तालुकावासीयांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत गुहागर पोलिस स्थानकात देण्यात आली आहे.यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, चिटणीस ज्योती परचुरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे,नरू वराडकर, पंचायत समिती माजी सदस्य दिलिप बागकर,महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे, शहराध्यक्षा नेहा वराडकर आदी उपस्थित होते.