चिपळूण- मुंबई -गोवा महामार्गावरील खड्ड्या बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देताच राष्ट्रीय महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले असून सावर्डे येथे महामार्ग अधिकारी,संबंधित ठेकेदार आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पेढे परशुराम ते आरवली पर्यंतचा रस्ता पूर्णतः खड्डेमुक्त चकचकीत करून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात संदीप सावंत यांना दिले.तसेच खोकेधारकबाबत देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत.तर चिपळूण परशुराम ते आरवली -खेरशेत हा रस्ता तर पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.दररोज अपघात होत असून अनेकजण जखमी होत आहेत.याची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी फक्त खड्डे भरणे नव्हे तर संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी केली होती.परंतु तात्पुरते खड्डे भरण्याचे उद्योग सुरूच होते.त्यामुळे संदीप सावंत यांनी थेट महामार्गावर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला होता.तसेच त्यांनी या आंदोलनाची जोरदार अशी तयारी देखील केली होती.शेकडो शिवसैनिक तसेच ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरण्याचे नियोजन संदीप सावंत यांनी केले होते. हे आंदोलन तीव्र होणार याची भनक लागताच प्रशासन खडबडून जागे झाले.सावर्डे येथे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मराठे तसेच संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत आज बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला संदीप सावंत विभागप्रमुख रूपेश घाग,कापसाळ विभागप्रमुख राम डिगे,मुर्तवडे उपविभागप्रमुख विजय नेवरेकर, सावर्डे उपविभाग प्रमुख प्रदिप चव्हाण,सावर्डे बाजार पेठ संघर्ष समिती अध्यक्ष माऊली चव्हाण, महिला शाखासंघटक मीनाक्षी जयस्वाल, उपशाखाप्रमुख सचिन निगडे,सुबोध चव्हाण,रविंद्र चव्हाण,सुरेश गुडेकर,बाबू घाणेकर,सुभाष जदियाल,संतोष गुरव,सिताराम मोरे,अमित कोकाटे.उपस्थित होते. या बैठकीत खड्डे भरण्याचे काम सुरू आहे परंतु पावसामुळे अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच संदीप सावंत कमालीचे संतापले.कोणतीही कारणे नको.आणि आम्ही फक्त खड्डे भरण्याची मागणी केलेली नसून संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून मागितला आहे.आणि या मागणीवर मी ठाम आहे.थातुरमातुर उत्तरे नको मला लेखी पत्र द्या अन्यथा आंदोलन करणारच अशी थेट भूमिका त्यांनी मांडली. अखेर प्रशासन आणि ठेकेदार कपनींनीने ही मागणी मान्य करून संपूर्ण रस्ता ओवरलॅप करून देण्यात येईल असे लेखी पत्र संदीप सावंत यांना देण्यात आले.त्यामुळे बोंबाबोंब आंदोलन तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय संदीप सावंत आणि शिवसैनिकांनी घेतला आहे.परंतु मागणीप्रमाणे काम झाले नाही तर केव्हाही रस्त्यावर उतरू असेही संदीप सावंत यांनी यावेळी सुनावले आहे.या बैठकीत सावर्डे येथील खोकेधारकबाबत देखील सकारत्मक चर्चा झाली आहे.अशी माहिती संदीप सावंत यांनी दिली आहे.