खेड -लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत होणारे जलप्रदुषण, त्यामुळे मच्छिमार समाजाची होत असलेली उपासमार या प्रश्नांकडे गेली ३० वर्षे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही आश्वासनांखेरीज काहीही मिळाले नसल्याने उद्या (२ ऑक्टोबर रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दर्यासारंग मच्छिमार भोईसमाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने लक्ष्यवेधी उपोषण करण्यात येणार आहे.
मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की, लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी कोतवली सोनपात्रा नदीमार्गे दाभोळ खाडीत सोडले जाते. गेली ३० वर्षे हे सुरुच आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत असून खाडीतील मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या खाडीत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मच्छिमारांच्या होत असलेल्या उपासमारीकडे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट २०२० रोजी मंडळाने उपोषणाचा इशारा दिला होता. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंडळाला एक पत्र प्राप्त झाले होते. या पत्रामध्ये प्रदुषणावर अंकुश ठेवणाऱ्या शासकिय यंत्रणांसह संबधित कारखान्यांना प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याचे नमुद करून उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची सुचना करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी यांच्या सुचनेचा आदर करत १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र तिथपासून आजतागायत दाभोळ खाडीत होणारे जलप्रदुषण न थांबल्याने किंवा संबधितांवर कोणत्याही शासकिय यंत्रणेने कारवाई न केल्याने नाईलाजास्तव २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करावे लागत असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सचीव विजय जाधव, रत्नाकर महाकाळ, व विलास जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.