गुहागर -गुहागर तालुक्यात हळव्या प्रकारातील भात शेतीवर करपा सदृश्य रोग पडल्याने व भात पिकाची उंची आवश्यक त्या प्रमाणात न वाढल्याने हळवी भातशेती नुकसानीत जाणार आहे.याबाबत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे.
भात व नागलीच्या शेतीमध्ये यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या भात व नाचणीच्या शेतीमध्ये नव्वद दिवसात पिकास येणारे हळवे बियाणे व एकशे वीस दिवसानंतर पिकास येणारे महान बियाणे अशा दोन प्रकारांमध्ये हे बियाणे वापरले जाते. त्यानुसार हळव्या पीक बियाण्यातील भातशेती कापणीच्या वेळेस गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी या शेतीवर करपा सदृश्य रोग पडल्याचे दिसत असुन यामुळे हे पीक वाया जाणार आहे तर काही ठिकाणी या हळव्या शेतीची उंची आवश्यक त्या प्रमाणात न वाढल्याने भातशेती पसवलेली दिसत नाही. यावर्षी शेतीचे प्रमाण जरी वाढले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात काहीच पिक पडणार नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी तालुक्यातील भातपिकाच्या परिस्थितीची तात्काळ पाहणी करावी व संबंधित शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.