चिपळूण – गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नागपूरसह राज्याच्या विविध भागांतून कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर उत्साहापेक्षा महागड्या रेल्वे प्रवासाचे संकट उभे ठाकले आहे. नियमित गाड्यांना पर्याय म्हणून सोडण्यात येणाऱ्या ‘विशेष’ गाड्यांच्या नावाखाली प्रवाशांकडून तब्बल दीड ते दुप्पट भाडे आकारले जात असल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेकडून २४६ तर पश्चिम रेल्वेकडून ६० विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीचा विचार करता आणखी फेऱ्या वाढवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रवासी संघटनांनी तब्बल ४०० विशेष फेऱ्यांची मागणी केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या मागणीवर किती गांभीर्याने निर्णय घेते, याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.
नियमित गाडीचे भाडे कमी; ‘विशेष’ गाडीचे दुप्पट!
मुंबई ते खेड या मार्गाचे उदाहरण घेतले तर नियमित रेल्वेतील स्लीपरचे भाडे सुमारे २०५ रुपये, तर विशेष गाडीच्या स्लीपरसाठी तब्बल ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रवाशांच्या खिशातून जवळपास दुप्पट रक्कम काढली जाणार आहे. एसी थ्री टायरसाठी नियमित भाडे ५२० रुपये असताना विशेष गाडीसाठी १,०७० रुपये, तर एसी टू टायरसाठी नियमित ७२५ रुपयांऐवजी तब्बल १,४७० रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे ‘विशेष सुविधा’ या नावाखाली प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
गाड्या ‘विशेष’; पण वेळापत्रकाचे काय?
प्रवाशांचा संताप केवळ भाडेवाढीपुरता मर्यादित नाही. जादा गाड्या सोडायच्या, पण त्या वेळेवर धावायच्या नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. अनेकदा या विशेष गाड्यांना नियमित गाड्यांच्या तुलनेत कमी प्राधान्य मिळते आणि त्या तीन ते पाच तास, तर कधी त्याहून अधिक विलंबाने धावतात.मग प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, ज्या गाडीला जादा भाडे मोजून प्रवास करायचा, तीच गाडी वेळेवर पोहोचणार नसेल तर या ‘विशेष’ सेवेचा फायदा नेमका कोणाला?
‘पर्याय’ की चाकरमान्यांची लूट?
गणेशोत्सवात कोकण मार्गावर नियमित गाड्यांची क्षमता वाढवण्याऐवजी विशेष गाड्यांचा पर्याय पुढे केला जातो. गर्दीच्या काळात पर्याय नसल्याने चाकरमान्यांना नाइलाजाने या गाड्यांचे तिकीट घ्यावे लागते. त्यामुळे ‘पर्यायाच्या नावाखाली अतिरिक्त वसुली’ होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात येतात. त्यांच्या भावनेचा आणि प्रवासाच्या अपरिहार्यतेचा फायदा घेतला जातोय का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मग कोकण रेल्वे कोकणवासीयांच्या किती फायद्याची?
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नाही, तर आपल्या मातीशी, गावाशी आणि कुटुंबाशी जोडणारा भावनिक उत्सव आहे. मुंबई-पुण्यात रोजगारासाठी गेलेला चाकरमानी वर्षभर वाट पाहून गणपतीसाठी गावी परततो. मात्र याच काळात प्रवासाचा खर्च वाढत असेल, गाड्या उशिराने धावत असतील आणि पर्याय म्हणून दिलेल्या विशेष सेवेलाही अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत असतील, तर ‘कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी?’ हा प्रश्न आता कोकणवासीय विचारू लागले आहेत.
गणेशोत्सवाच्या गर्दीचा भार प्रवाशांच्या खिशावर टाकण्याऐवजी नियमित गाड्यांची क्षमता वाढवा, पुरेशा विशेष फेऱ्या चालवा, त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळा आणि वाढीव भाड्याच्या धोरणाचा फेरविचार करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण चाकरमान्यांना गणरायाच्या दर्शनासाठी गावी जायचे आहे; रेल्वेच्या ‘विशेष’ भाड्याचा आर्थिक बळी व्हायचे नाही!
Home ताज्या बातम्या गणेशोत्सवात कोकणवासीयांच्या खिशाला रेल्वेची कात्री; ‘विशेष’ गाड्यांच्या नावाखाली दुप्पट भाड्याची वसुली?


















