
१९७७ मध्ये भिंगरी नावाचा चित्रपट मराठी मध्ये येऊन गेला.या चित्रपटात गीतकार जगदीश खेबुडकर याचं एक लोकप्रिय गाणं आहे.या गाण्यात नटी म्हणते
सजणा रं काय सांगू
कुणी जादू केली
लाज मला आली बाई
लाज मला आली
आज या गाण्याची आठवण व्हावी त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनासाठी आपण येणार नाही कारण मला लाज वाटते असं वक्तव्य जाहीर कार्यक्रमात केलं आहे.गडकरी साहेबांच्या अनेक रेकॉर्डमध्ये प्रदीर्घकाळ लांबलेला आणि त्यांच्या कार्यशैलीला डाग लावणारा महामार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाची नोंद अधिक ठळक झाली आहे. दरवर्षी डिसेंबर अखेर ही डेडलाईन गडकरी साहेब आपल्या तोंडानेच देत होते.आणि त्यांचे अधिकारी त्यांना तोंडावर पाडण्याचं काम करत होते त्यामुळे आज त्यांना लाज वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना ती वाटलीच पाहिजे परंतु ही लाज एकट्या गडकरींना वाटून उपयोग नाही.या महामार्गाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित विभागाचे मस्तवाल अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या बगलबच्चा बेजबाबदार पोट ठेकेदारांना देखील ही लाज वाटली पाहिजे.गडकरी साहेबांनी ही खंत व्यक्त केली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कोकणच्या विकासाला, पर्यटनाला,अर्थकारणाला दिशा देणारा व्हिजनरी प्रोजेक्ट म्हणून या महामार्गाकडे पाहिलं जात होतं. मात्र भू संपादन, पर्यावरणविषयक परवानग्या, ठेकेदारांचे सोडून जाणे,कोर्टात जाणे,नवीन ठेकेदार येणे आणि कोकणातील कठीण भौगोलिक परिस्थिती अशा अनेक अडचणींमुळे हा महामार्ग अजून लटकला आहे. या महामार्गाच्या नंतर देशात अनेक महामार्ग पूर्ण झाले. आपल्याकडे समृद्धी महामार्ग पूर्ण झाला,शिवडी न्हावा शेवा अटल सेतू पूर्ण होऊन आमचे पुढारी अगदी वेगाने मंत्रालयात पोहचू लागले.मुंबई पुणे महामार्गावरचा मिसिंग लिंक पूर्ण होऊन त्याचं परदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञान पहिल्याच पावसाळ्यात खाली येऊन पुन्हा स्थिरस्थावर झालं तरी कोकणी माणूस अजूनही इंदापूर माणगाव मधून किती तासांनी आपली सुटका होईल याच विचारात आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल.
गडकरी साहेब, याची जी कारणं आहेत ती शोधावी लागणार नाहीत इतकी ती उघड आहेत.अगदी चिपळूण खेड तालुक्यापुरतं बोलायचं म्हटलं तर भोस्ते आणि परशुराम घाटाची परिस्थिती पाहिली की ज्यांनी या मार्गाचा सर्व्हे केला ते अधिकारी कॉपी करून पास झाले असावेत अशी शंका येते. दुसरं म्हणजे या महामार्गाच्या कामात अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या लोंबत्याना दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या तुकड्याची कामे देऊन महामार्गाचा अक्षरशः केक करून टाकला.त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची पाळी ठेकेदारावर आली असं आता लोक खासगीत सांगतात. महामार्गाच्या आढावा बैठकीत कामातील अडचणींची चर्चा कमी आणि बगलबच्चा पोट ठेकेदारांची रडगाणी अधिक असत आजही ती आहेतच. काही ठराविक भाग सोडले तर कामाचा दर्जा कुठे दिसत नाही. पावसाळ्यात अनेक ठिकाणी महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहते.परशुराम घाटात संरक्षण भिंती खचण्याचे प्रकार सुरूच आहेत.भोस्ते घाटातील मोठ्या वळणावर संरक्षणासाठी लावून लावून खेड चिपळूण मधील टायरवाल्यांकडचे टायर.संपले तरी भय इथले संपत नाही अशीच परिस्थिती आहे.अनेक ठिकाणी रस्त्याचे काँक्रिट उखरून गेलं आहे.काँक्रिटला भेगा पडल्या आहेत.पुलावरचे जॉइंट वाहनचालकांना आणि प्रवाशांना मनसोक्त दणके देत आहेत.जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर खाली गेला हे कसलं नियोजन आहे ? गडकरी साहेब आता ही कुणी जादू केली? ज्यामुळे तुम्हाला लाज आली त्याचा सखोल तपास एकदा करायलाच हवा.आपण म्हणालात की येत्या काळात अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा एक नवा रेकॉर्ड करण्याची आपली इच्छा आहे.ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला लवकरच मार्ग आणि मुहूर्त मिळावा अशी अपेक्षा आहे.मात्र आपल्यासह आमच्या मनातील या इच्छा पूर्ण होण्यासाठी डेडलाईन देत बसू नका.मुंबई गोवा महामार्गाचा अपवाद सोडला तर आपण शब्दाला पक्के आहात.देशातील जनतेने अनेकदा हा अनुभव घेतला आहे.आता कोकणी माणसाला सुद्धा तो अनुभव येऊद्या.



















