बातम्या शेअर करा

सातारा – (प्रविण गाडे. ) – स्थानिक प्रश्नांना वाचा फोडत समाजाच्या विविध घटकांचा आवाज बनलेल्या ‘प्रगती टाइम्स’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत वाई येथील सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, वाई येथे पार पडला. पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व, विश्वासार्हता आणि बातमी मांडताना घ्यावयाची काळजी यावर यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिनकर (बापूसाहेब) शिंदे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमर कोल्हापुरे (संचालक, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई), विजय ढेकाने (नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते, वाई नगरपरिषद) आणि सचिन ननावरे (अध्यक्ष, वाई तालुका मराठी पत्रकार संघ) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ‘प्रगती टाइम्स’च्या वतीने शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. पत्रकार बांधवांचाही तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
महिला लोकप्रतिनिधींचा विशेष सन्मान ‘प्रगती टाइम्स’च्या कराड प्रतिनिधी विजया माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका केतकी पाटणे, जागृती पोरे, पद्मा पाडळे आणि अपर्णा जमदाडे यांचा सन्मान करण्यात आला. सचिन ननावरे यांनीही मनोगत व्यक्त करून ‘प्रगती टाइम्स’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील प्रश्न, सामान्य नागरिकांच्या समस्या आणि समाजातील सकारात्मक घडामोडींना व्यासपीठ देण्याचे काम वृत्तपत्राने सातत्याने करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य दिनकर (बापूसाहेब) शिंदे यांनी ‘प्रगती टाइम्स’च्या पत्रकारितेच्या वाटचालीचे कौतुक केले. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘प्रगती टाइम्स’ करत असल्याचे त्यांनी नमूद केले. वृत्तपत्राने यापुढेही समाजातील सकारात्मक घडामोडी, विकासकामे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपली विश्वासार्हता अधिक दृढ करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
तसेच बदलत्या काळातील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावावरही शिंदे यांनी भाष्य केले. आजच्या वेगवान युगात बातमी काही क्षणांत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता आणि वस्तुस्थिती तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वेगापेक्षा विश्वासार्हतेला अधिक महत्त्व देत जबाबदार पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना बातमी करताना कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत, याचे सखोल विश्लेषण केले. पत्रकारितेत वस्तुनिष्ठता, सत्यता आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक असून, कोणत्याही बातमीमागील तथ्य पडताळून पाहणे ही पत्रकाराची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे बातमी मांडताना शब्दांची जबाबदारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे,’ असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास नगरसेवक प्रसाद बनकर, सुशील खरात, माजी नगरसेवक प्रदीप चोरगे, वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, प्रगती टाइम्स न्यूज ची सुरुवात झाली असून परखड सत्य निरपेक्ष आणि संतुलित बातम्यांच्या बळावर प्रगती टाइम्स न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. यामध्ये आमचे सर्व प्रतिनिधी दर्शक आणि वाचकांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दात सातारा जिल्हा प्रतिनिधी प्रविण गाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रगती टाइम्स न्यूजचा प्रवास सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिजिटल मीडियाच्या सारिका गवते, शुभम कोदे, प्रविण नवघरे आणि प्रशांत थोरवे यांनी मोलाचे सहकार्य केले. ‘प्रगती टाइम्स’च्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या सोहळ्यामुळे पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाला एक सकारात्मक व्यासपीठ मिळाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here