कुटगिरीतील साकव दुर्घटनेनंतर प्रशासनाची धाव; उपसभापती निलेश सुर्वे यांनी केली घटनास्थळी पाहणी

0
604
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच बाधितांना दिलासा दिला.
सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा लोखंडी साकव अचानक कोसळल्याने कुटगिरी व कोतळूक गावांमधील संपर्क तुटला. या दुर्घटनेत १० ते १२ गुरे जखमी झाली असून एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही.
यावेळी बोलताना उपसभापती निलेश सुर्वे म्हणाले की, या साकवाच्या पुनर्बांधणीसाठीचे अंदाजपत्रक यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून नवीन साकव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दुर्घटनेत जखमी झालेल्या गुरांसह गाभण गाईंवर त्वरित उपचार करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या पाहणीवेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा शिगवण, चारुदत्त सावंत, मनोहर खेतले सोसायटीचे चेअरमन कृष्णा सोलकर, नामदेव खेतले, प्रकाश वीर, ग्रामसेविका प्राजक्ता पाटील, विनय कातळकर आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here