गुहागर – गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरात एक धक्कादायक दुर्घटना घडली. नदीवरील लोखंडी पूल अचानक कोसळल्याने त्याच क्षणी पुलावरून जात असलेली सुमारे १० ते १२ गुरे थेट लोखंडी गर्डरखाली अडकली. या भीषण दुर्घटनेत दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, उर्वरित जनावरांना वाचवण्यासाठी ग्रामस्थ जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या आवाजासह पूल नदीत कोसळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र नदीला आलेला प्रवाह, कोसळलेले जड लोखंडी गर्डर आणि त्याखाली अडकलेली जनावरे यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे. काही युवकांनी थेट नदीत उतरून जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांची सुटका शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, हा लोखंडी पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि नवीन पुलासाठी प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र नवीन पूल उभारण्यापूर्वीच जुना पूल कोसळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा पूल गावाचा जीवनदुवा होता. शेती, स्मशानभूमी तसेच दैनंदिन ये-जा यासाठी गावातील नागरिक पूर्णपणे याच पुलावर अवलंबून होते. पूल धोकादायक झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या पैशातून जेसीबीच्या साहाय्याने तो उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्तीही केली होती. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
















