गुहागर ; भूमिपुत्रांच्या जमिनी सुरक्षित ठेवा; शासनाने ‘कुळ’ अर्जांची सखोल चौकशी करावी – एकनाथ सकपाळ

0
137
बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील झोंबडी गावात वडिलोपार्जित जमिनींवर डोळा ठेवून ‘कुळ’ कायद्याचा आधार घेत काही जण लाखो रुपयांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक एकनाथ सकपाळ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदन देत शासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा कोकणातील हजारो भूमिपुत्रांच्या जमिनी धोक्यात येतील, असा इशारा दिला आहे.
सकपाळ यांनी म्हटले आहे की, झोंबडीसह गुहागर तालुक्यातील अनेक कुटुंबांची मुले-मुली रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच परदेशात स्थायिक झाली आहेत. त्यामुळे गावातील वडिलोपार्जित जमिनींकडे त्यांचे नियमित लक्ष राहू शकत नाही. अनेक ठिकाणी जुन्या पिढीचे निधन झाल्यानंतर वारसांची नावे सातबाऱ्यावर नोंद झाली असली तरी प्रत्यक्ष जमिनीची माहिती किंवा देखरेख करण्यासाठी ते गावात राहत नाहीत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्ती “मी २०-२५ वर्षांपासून ही जमीन कसत आहे”, “मीच शेती करतो” अशा दाव्यांच्या आधारे कुळ हक्क मिळविण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लाखो रुपयांच्या किमतीच्या जमिनी कागदोपत्री आपल्या नावावर करण्यासाठी काही जण प्रशासनाकडे अर्ज करत असल्याचीही त्यांनी शंका व्यक्त केली.
तसेच सकपाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कुळ कायदा हा खऱ्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे; परंतु त्याचा गैरवापर करून भूमिपुत्रांच्या वडिलोपार्जित जमिनी हिसकावण्याचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अशा प्रत्येक अर्जाची महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
त्यांच्या मते, कुळ हक्काचा दावा करणारी व्यक्ती संबंधित गावात नेमकी किती वर्षे वास्तव्यास होती, ती प्रत्यक्षात जमीन कसत होती का, तिच्याकडे कोणते पुरावे आहेत, महसूल नोंदी काय सांगतात, ग्रामस्थांचे म्हणणे काय आहे, याची बारकाईने शहानिशा झाल्याशिवाय कोणालाही कुळ हक्क मंजूर करू नयेत.
“आज रोजगारासाठी बाहेर गेलेल्या युवकांच्या पिढीला गावातील प्रत्येक जमिनीची माहिती असणे शक्य नाही. याचा अर्थ त्यांच्या पूर्वजांची मालमत्ता कोणीही बळकावावी, असा होत नाही. भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असेही सकपाळ यांनी ठामपणे नमूद केले.
गुहागर तालुक्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा असून, महसूल विभागाने प्रत्येक प्रकरणात निष्पक्ष चौकशी करूनच निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
माजी सैनिक एकनाथ सकपाळ यांनी शासनाला नम्र विनंती करत म्हटले आहे की, वडिलोपार्जित जमिनींवर कुळ कायद्याच्या नावाखाली कुणावरही अन्याय होऊ देऊ नये. महसूल यंत्रणेने कठोर पडताळणी करून खऱ्या भूमिपुत्रांना न्याय द्यावा आणि जमिनी बळकावण्याच्या प्रवृत्तीला कायमचा आळा घालावा.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here