चिपळूण – कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी जाहीर आणि थेट ऑफर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली. जठार यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
चिपळूण येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भास्कर जाधव आणि प्रमोद जठार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मात्र कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जठार यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले.
“भास्कर जाधव हे कोकणातील अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व आहे. अशा नेत्याला त्यांच्या पक्षात योग्य न्याय मिळत नाही. त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या राजकारणात सहभागी व्हावे. त्यांच्या अनुभवाचा राज्य आणि कोकणच्या विकासासाठी मोठा उपयोग होईल,” असे आवाहन जठार यांनी केले. विशेष म्हणजे, जठार यांनी भास्कर जाधव यांच्यावर कोणतीही राजकीय टीका न करता त्यांच्या नेतृत्वाचे उघडपणे कौतुक केले. त्यामुळे ही केवळ राजकीय प्रतिक्रिया नसून भाजपकडून दिलेला स्पष्ट राजकीय संदेश मानला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते व मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्यात भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला दिलेल्या भेटीची जोरदार चर्चा झाली होती. त्या भेटीनंतर आता प्रमोद जठार यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने, कोकणातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा अधिकच रंगली आहे. या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रमोद जठार यांच्या या खुल्या ऑफरला भास्कर जाधव काय उत्तर देणार? तसेच ठाकरे शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















