खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला मॅगीने भरलेला कंटेनर जगबुडी नदी पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावरील दोन पुलांच्या मधून थेट जगबुडी नदीपात्रात कोसळला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नदीत कोसळल्यानंतर कंटेनर पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेला आणि नदीपात्रात जाऊन अडकला. अपघाताच्या जोरदार धडकेमुळे कंटेनरमधील मोठ्या प्रमाणातील मॅगीची पाकिटे बाहेर पडून नदीपात्रात आणि आजूबाजूच्या परिसरात विखुरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कंटेनरमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी कोणी प्रवास करत होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चालकासह अन्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती उपाययोजना केली. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अतिवेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अन्य तांत्रिक बिघाड यापैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. चालक आणि अन्य व्यक्तींची माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण बचावकार्य आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
















