चिपळूण – चिपळूण तालुक्यातील रामपूर-मार्गताम्हणे परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात आता शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, महावितरणने ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुका सभापती जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी दिला आहे.
चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील अनेक ग्राहकांच्या घरांवर बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यापूर्वी महावितरणच्या चिपळूण येथील अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर काढून त्याऐवजी जुने मीटर बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मार्गताम्हणे विभागात यापुढे एकाही ग्राहकाच्या घरावर स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच नुकतेच रुजू झालेल्या कार्यकारी उपअभियंत्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना चव्हाण म्हणाले की, गावांना सकाळी पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाच्या वेळेत अनेकदा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होते. पंप सुरू करण्यासाठी ऑपरेटरला पुन्हा दोन किलोमीटर अंतर पार करावे लागते. सध्या पावसाअभावी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या वीजखंडितीमुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महावितरणने स्मार्ट मीटरचा प्रश्न आणि सकाळच्या वीजपुरवठ्याचा मुद्दा तातडीने मार्गी लावावा, अन्यथा लवकरच मार्गताम्हणे वीज कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी दिला आहे.















