गुहागर – नगरपंचायतीकडून दुसऱ्यांदा सुधारित विकास आराखडा जाहीर झाला असून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती आणि सूचनांनुसार कोणत्याही बदल न करत केराची टोपली दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताचे निर्णय होण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवून जनतेच्या अडचणी जाणून घ्याव्यात, अशी मागणी शहरवासियांनी नगराध्या नीता मालप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपंचायतीने हरकती व सुचनांनुसार सुधारणा करण्यात आलेला नवीन विकास आराखडा जनतेच्या हरकती व सुनावणीसाठी ठेवला असून आराखडा समजून सांगण्यासाठी प्रत्येक प्रभागाच्या नगरपंचायत दालनामध्ये बैठका घेण्यात येत आहेत. याबाबतीत आम्हा नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे या प्रारुप विकास आराखड्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी लवकरात लवकर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. हरकती व सूचना देण्यासाठीची अंतिम मुदत २३ एप्रिल आहे. यामुळे ही सभा लवकरात लवकर घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राकेश साखरकर, नितीन शेटे, मंगेश पडवळ, मंदार कचरेकर, विरेंद्र शेटे, दिवेश मोरे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.
दरम्यान, गुहागर नगरपंचायतीच्या सुधारित प्रारुप विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन वस्तूस्थितीची माहिती दिली. यावर पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. आपण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ बैठक घेऊन या आराखड्याबाबत जनतेच्या बाजूने निर्णय घेऊ, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी शिवसेनेचे राजेश बेंडल, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, उपनगराध्यक्ष प्रदीप बेडल, नगरसेवक अमोल गोयथळे, अमरदीप परचुरे, स्वरा तेलगडे, दत्ता जांगळी, गणेश तेलगडे, प्रथमेश दामले उपस्थित होते.

















