गुहागर – गुहागर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा शृंगारतळी बाजारपेठे मधून वाहणाऱ्या नदीमध्ये दूषित पाणी सोडले जाऊन शृंगारतळी आणि जानवळे या परिसरातील विहिरींमध्ये असलेले पाणी दूषित होत असल्याची बातमी प्रगती टाइम्सने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन याबाबत काय कारवाई करावी यासाठी निर्देश दिले.
शृंगारतळी येथील प्रसाद जावकर यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या नदीमध्ये शृंगारतळी मधील अनेक बांधकाम व्यावसायिक, दुकानदार ,हॉटेल व्यवसायिक आपले शौचालयाचे पाणी या नदीत सोडत होते. परिणामी या परिसरात घाणीच्या साम्राज्य पसरले होते. या दूषित पाण्यामुळे या नदी शेजारी असणाऱ्या अनेक विहिरी या पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा दाखला आरोग्य विभागाने दिला होता. तर जानवळे येथील काही ग्रामस्थांच्या घरात जुलाब आणि उलटी यासारखे आजार स्थानिकांना झाले होते. त्यामुळे या नदीत सोडण्यात येणारे दूषित पाणी बंद करावे अशी मागणी अनेक वेळा येथील ग्रामस्थ करत होते. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही झाले होते. आणि तशा प्रकारच्या बातम्याही प्रगती टाइम्सने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र नुकतीच शृंगारतळी येथील हॉटेल हेमंत रेस्टॉरंट आणि बार यांच्या बायोटेक्नॉलॉजी शुद्धीकरण प्रकल्पातून सुद्धा अशुद्ध पाणी सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या परिसरात सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर या संपूर्ण प्रकरणात गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी लक्ष घालून या ठिकाणच्या ग्रामस्थांची नुकतीच एक बैठक घेतली तसेच या नदी शेजारी असणाऱ्या पानवट्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी या नदीत जे कोणी दूषित पाणी सोडतील त्यांच्यावर कारवाई ग्रामपंचायतने करावी आणि त्याचे पत्र गुहागरचे गटविकास अधिकारी यांना द्यावे असे त्यांनी नमूद केले. तसेच यावेळी शृंगारतळी आणि जानवळे या ग्रामपंचायतीमधील पाच लोकांची एक कमिटी तयार करावी आणि ती कमिटी त्या दूषित पाण्यांवर देखरेख करेल असे त्या कमिटीचे काम राहील असे त्यांनी सांगितले. सभापती प्रणव पोळेकर यांनी या दूषितपणे संदर्भात पुढाकार घेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने या परिसरातून समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दूषित पाणी संदर्भात जी बैठक पार पडली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शृंगारतळीचे पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, तसेच दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
















