रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पनवेल-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव आणि मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-पनवेल मार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. या वळविण्यात आलेल्या गाड्या २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावणार आहेत, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील पेडणे येथील बोगद्यात दरड रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वेवर काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम येथून काही एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येत आहे. मात्र, या गाड्या पनवेल, पुणे, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर आलेली दरड मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरील वाहतूक २० ऑगस्टपर्यंत सुरळत होणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे २० ऑगस्टपर्यंत या गाड्या दुसऱ्या मार्गाने धावणार आहेत.