दापोली – कोणतेही शासकीय काम असो, दिल्या-घेतल्याशिवाय होत नाही असा सर्वसामान्यांचा समज आहे.परंतु त्यास प्रत्यक्ष कृतीतून जोड देण्याचे काम दापोली येथील महिला तलाठ्यांनी केले आहे.सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करून नाव चढवण्यासाठी १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील साझा नानटे येथील ग्राम महसूल अधिकारी श्रध्दा बालाजी बंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी, तालुका दापोली येथील खाते क्रमांक ७४, गट क्रमांक ३११, क्षेत्र ७८ गुंठे अशी जमीन एकत्रित खरेदीखताद्वारे खरेदी केली होती. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या मित्रांची नावे नोंद करण्यासाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय, साझा नानटे येथे ग्राम महसूल अधिकारी श्रध्दा बंडे यांची भेट घेतली होती.यावेळी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद करून उतारा देण्यासाठी बंडे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार तहसीलदार कार्यालय, दापोली येथे बंडे यांना भेटले असता, फेरफार मंजूर झालेला व दाखल झालेल्या सातबारा उताऱ्याची प्रत देण्यासाठी पुन्हा १०,००० रुपयांची मागणी करण्यात आली.या सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यूनिट येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान श्रध्दा बंडे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी पथकाने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्र आणि भागवत सोनावणे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून. अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, रत्नागिरी यांनी ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, उदय चांदणे, श्रेया विचारे, दिपक आंबेकर, राजेश गावकर व समिता क्षिरसागर यांनी सहभाग घेतला.
















