चिपळूण – जिल्ह्याचे पालकमंत्री हे एखाद्याच्या पोटात शिरून गोड बोलण्यात पटाईत आहेत. जे व्यासपिठावर बसले, त्यांच्यामुळेच मी आहे, असे ते सर्वांनाच सांगत असतात. अशा लोकांनी केवळ पैशाच्या जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकल्या. मात्र कमी जागा जिंकल्या म्हणून मी खचून जाणार नाही. अनेक पदाधिकारी सोडून गेले तरी आगामी काळात पुन्हा नवे पदाधिकारी निर्माण करू. संघर्षाने वाटचाल करत पुन्हा मतदार संघात ताकद उभी करूया, असा विश्वास पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी येथील मेळाव्यात व्यक्त केला.
शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात ठाकरे सेनेच्या विजयी आणि विजयासाठी लढलेल्या गुहागर व चिपळूण मतदार संघातील सर्व उमेदवारांचा सत्कार आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे सेनेकडून सामान्य, उच्चशिक्षित आणि सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना स्थान दिले. या उमेदवारांनी विजयासाठी निकराने झुंज दिली. यात काही यशस्वी ठरले तर काहींना अपयश आले. या निवडणुकीत शिंदेसेना भाजपच्या नेत्यांनी पैशाचा पाऊस पाडल्याने ठाकरे सेनेला मोठा पल्ला गाठता आला नाही. असा उमेदवार हवा, तसा हवा, असे सांगणारे खूप असतात. हवे तसे उमेदवार दिले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत संबंधीत उमेदवारांच्या प्रचारासाठी सल्ले देणारे महाशय पुढे येत नाही. ठाकरे सेनेचे अनेक उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले. विरोधकांनी पैशाचा अमाप वापर केला. आमच्यातील काही पदाधिकारी देखील त्यांच्या गळाला लागले हे वास्तव आहे. गेल्या १८ वर्षाच्या कालखंडात पराभूत झालेल्या अनेक कार्यकर्त्याना पुन्हा निवडून आणलेले आहे. जे सहकारी सोडून गेले, त्यांनी माझ्यावर कधी टीका केली नाही. मात्र या निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही म्हणून मी खचून जाणारा नेता नाही. या निवडणुकीने आत्मचिंतन करण्याची वेळ पक्ष प्रमुख, नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. आजपर्यंतची वाटचाल संघर्षातून उभी राहिली आहे. यापुढेही उभारी घेण्यासाठी संघर्ष करूयात.
अंजनवेल गटातून विजयी झालेले विक्रांत जाधव म्हणाले, विजयी उमेदवारांचा सत्कार होण स्वाभाविक आहे. परंतु ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी निकराने लढा दिला. त्यांचा सन्मान करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. संतोष थेराडे, संतोष चव्हाण, माजी सभापती शिंदे, सौ. नेहा माने, सुभाष जाधव यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत निवडणुकीतील किस्से सांगितले. त्यांनी यापुढेही आमदार जाधवांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
















