चिपळूण – चिपळूणच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेने जोर धरला आहे. तो म्हणजे शिवसेना (उबाठा)चे नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे आमदार शेखर निकम यांची अनपेक्षित भेट पुढे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे ही चर्चा अधिकच रंगू लागली आहे.
चिपळूण पंचायत समितीतील १८ गणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (उबाठा) गटाला ४, युतीतील शिवसेना शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. एकट्या राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची साथ अपरिहार्य ठरते.चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यात आले होते. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आणि केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्या कटू अनुभवातून बोध घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीने स्वतंत्र ताकदीवर लढवण्याचा निर्धार केला. आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील कटू अनुभव पाहता आमदार शेखर निकम युतीच्या मदतीने सत्ता स्थापन करतील, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र राष्ट्रवादीचा सभापती आणि समान भूमिकेवर सहमत असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.चिपळूणच्या राजकारणात निर्णायक क्षण एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम जर एकत्र आले, तर चिपळूणच्या राजकारणात तो मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ‘ती’ भेट पुढे सत्तेची ‘गोड’ सुरुवात ठरते की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
















