गुहागर – वृद्धाला गंभीर मारहाण प्रकरणात पोलिसांची ढिसाळ भूमिका ,भुवड कुटुंबाचे आमरण उपोषणा सुरू

0
634
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडीमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गुहागर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने ते मोकाट फिरत असून संपूर्ण परिसर दहशतीखाली असल्याचा आरोप पीडित भुवड कुटुंबीयांनी केला आहे. न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीपासून आमरण सुरुवात केली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीला न्याय मागण्यासाठी पोलिसांना विनंती करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने भुवड कुटुंबांनी न्याय कोणाकडे मागावा. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस कधीक्षक यांना आपली व्यथा मांडली आहे. यावरून गुहागर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वेलदूर घरटवाडी येथे गणपत धाकू भुवड (वय ६९) आणि त्यांच्या पत्नी शालिनी भुवड यांच्यावर लाकडी बांबू व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणपत भुवड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग रघुनाथ भुवड (६०) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर, अजामीनपात्र कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहूनही पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही, ना कोणतीही कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे आरोपी व त्याचे साथीदार गुहागर-रानवी परिसरात मोकाट फिरत असून कधीही पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी भीती पीडित कुटुंबाला सतावत आहे. भुवड कुटुंबीयांनी निवेदनात म्हटले आहे की, आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही तर जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासनाकडून प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याने न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आरोपींचे मनोबल वाढल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे गुहागर न्यायालयात प्रलंबित असलेला जमिनीचा वाद आहे. न्यायालयात वाद प्रलंबित असतानाही संशयित पांडुरंग भुवड याने तीन कामगारांसह फिर्यादींच्या घरासमोरील बांध फोडण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावर गणपत व त्यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला, तसेच शिवीगाळ व धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र, तपासाच्या नावाखाली कारवाईला विलंब होत असल्याने पोलिसांवर तीव्र टीका होत आहे. त्याप्रकरणी अद्यापही आरोपींना अटक न झाल्याने भुवड कुटुंबियांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here