खेड – २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटदरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहेत.
खेड तालुक्यातील कळंबणी येथे असलेला पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या भेगा पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे. या महामार्गावर सुरू असलेल्या चार पदरी रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले असावे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना अतिशय काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर जगबुडी नदीने ६.४० मीटरची धोकादायक पातळी गाठली असून, अनेक परिसर जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील २४ तासांत खेडमध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.