रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथे रविवारी सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली मात्र आता या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल १७ तासानंतर पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
या महामार्गावर झालेल्या अपघातामधील टँकरमधून गॅस गळती होत असल्याने खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती. या महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहून पोलिसांनी वाहतूक उक्षीमार्गे वळवली होती, मात्र त्यामुळे उक्षी घाटातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अखेर, पोलिस प्रशासन, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, ग्रामस्थ तसेच सर्व संबंधित प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास या महामार्गावरील निवळी घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यास यश आले असून सध्या हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.