खेड -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सोशल मीडियावरील बदललेल्या स्टेटसने ‘राज’कीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘निष्ठावंतांना कवडीचीही किंमत पक्षात नसते’ , या स्टेटसमुळे चर्चाना उधाणच आले आहे. या स्टेटसचे रहस्य उलगडेनासे झाले असून कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिंदे गटात येण्याची खुली ‘ऑफर’ देत आमच्यातील मतभेद भैरीच्या पायाखाली गाडून टाकतोय, असे सूचक विधानही केले होते. या ऑफरनंतर वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडेच साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या सोशल मीडियावरील बदललेले ‘स्टेटस्’ चर्चेचा विषयच ठरले आहे. ‘अपने दम पर बनाया है मै, किसी के मेहरबानी से नहीं’ हा फेसबुकवरील व्हिडिओही चर्चेचा विषयच बनला आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सूरही आळवला जात आहे.