शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्यावतीने १५ वा राष्ट्रीय मतदार दिन प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून देशभर साजरा केला जातो. मतदानाचे महत्त्व सांगताना, तहसीलदार यांनी आपण राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा करतो आणि योग्य पद्धतीने मतदान करणे आणि समाज बदलण्याची क्षमता आणि जबाबदारी असलेल्या योग्य व्यक्तीला मतदान करणे ही आपली जबाबदारी कशी आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संपूर्ण राष्ट्र तसेच समाजातील परिवर्तनासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य नसून, लोकशाही टिकविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगभरात आदर्श मानली जाते. ईव्हीएम च्या माध्यमातून आज आपली मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे, आपल्याला नोटाचा अधिकार देण्यात आलेला आहे असे सांगून त्यांनी तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले शिवाय मतदार शपथ त्यांनी दिली.
यावेळी मंडल अधिकारी अनिल राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी सुभाष कदम, ग्राममहसूल अधिकारी सचिन शिंदे, महसूल सेवक रविंद्र भेकरे या सह सर्व महाविद्यायांमधील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण सनये यांनी केले तर डॉ. प्रसाद भागवत यांनी उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले.