चिपळूण – महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर होईल. ही बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होईल. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केले. त्यामुळे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवाराबाबतच सस्पेन्स कायम राहीला आहे.
चिपळुणात पक्षातर्फे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेआधी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील घडामोडींवर भाष्य केले. कोकणातील प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत खा. पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. १४ वर्षे होऊनही हा प्रोजेक्ट पूर्ण होत नसेल तर ते सरकारचे मोठे अपयश आहे. यामध्ये निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे. रस्त्याच्या कामाबद्दल लोकं जर तक्रारी करत असतील तर ते अजिबात चुकीचे नाही. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास या कामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू, असा इशाराच खा. पवार यांनी दिला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. यावेळी माजी आमदार रमेश कदम, प्रदेश सरचिटणीस आणि उद्योजक प्रशांत यादव आदी उपस्थित होते.