खेड- उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच खेड येथील काळकाई मंदिर सभागृहामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये दि. ४ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली उत्तर रत्नागिरी जिल्हा कमिटीबाबत आश्चर्य व्यक्त करीत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांच्याबद्दल प्रचंड चीड व मनमानी कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दक्षिण रत्नागिरीची नविन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर उत्तर रत्नागिरीची जिल्हा कमिटी व्हावी यासाठी या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षाविषयी नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात वंचितचे काम होत नसल्याने नवीन जिल्हाकामिटी करण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर बाळासाहेब आंबेडकरांनी गणेशोत्सव संपल्यानंतर मी मुंबईतून निरीक्षक पाठवेन त्यानंतर जिल्ह्याची कमिटी तयार करु असे सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच जिल्हा कमिटी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संघटन वाढीसाठी प्रयत्न न करता प्रत्येक तालुक्यात दोन दोन कमिट्या तयार करून संघटन विस्कळीत केलेल्या व कुणालाही विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या विकास (अण्णा) जाधव यांची पुन्हा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करीत याविषयी बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून वस्तुस्थिती सांगून व निवेदन देवून निष्क्रिय जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड येथील वंचित बहुजन आघाडीचे प्रामाणिक काम करणारे सुमारे ६० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.