गुहागर– गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील श्री पूजा सभागृहात आज उत्तर रत्नागिरी पाच तालुक्यांचे अधिवेशन पार पडले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नितेश राणे बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार तितकाच ताकदीचा असतो. माझ्या मतदारसंघात निवडणूक लढविताना मी समोरचा उमेदवार हुशारच समजतो. त्यामुळे त्याला कधीही कमी समजू नका असा सल्ला देऊन गाफील न राहता निवडणूक ताकदीनिशी लढा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
आज पार पडलेल्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, समोरच्या उमेदवाराला कधीच कमी समजू नये. मी निवडणुकीला सामोरे जाताना समोरचा उमेदवार किती ताकदीचा आहे, हेही पाहतो. आपण गाफील रहायचे नाही. निवडणुकीच्यावेळी माझ्या भाषणाच्या क्लिप मोहल्ल्यात फिरत असतात. जेथे मते मिळत नाहीत तेथे कधी जायचे नाही. मते मागताना हिंदुत्ववादी म्हणूनच मागतो. आता दाढ्या कुरवाळत बसू नका. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही, आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास केला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत ताकदीनिशी लढा असे आवाहन त्यांनी केले.
सरकार योजना जाहीर करते मात्र, त्या जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय आपल्या सरकारचे आहे मात्र, तुम्ही जर ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविलात नाहीत तर नको ते त्याचा गैरफायदा घेऊन मतदारांपर्यंत पोहचतील, त्यामुळे गाफील न राहता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या, असे आवाहन राणे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा माजी प्रवक्ते मधुकर चव्हाण, माजी आ. सूर्यकांत दळवी, डाँ. विनय नातू, धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष केदार साठे, सुरेखा खेराडे, सौ. निलम गोंधळी, स्मिता जावकर, चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.