चिपळूण – चिपळूण शहरात पुन्हा एकदा बांगलादेशी नागरीक राहत असलेली धक्कादायक घटना आज उघड झाली. आज तीन बांगलादेशी नागरिकांना चिपळूण पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पकडल्याने सर्वत्र चिपळूण पोलिसांचे कौतुक होत आहे. मात्र या बांगलादेशी नागरिकांना ज्यांनी आसरा दिला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा एकीकडे होत आहे.
गेल्या काही दिवसापासून चिपळूण शहरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू होती. याच चर्चेच्या आधारावर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने आणि चिपळूणचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत चिपळूण मध्ये आज तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात यश आले. यातील दोन नागरिक हे चिपळूण मधील नामवंत बिल्डर याच्या बांधकामावर काम करताना पकडण्यात आले तर एक जण त्याच्या भाड्याच्या ठिकाणी राहत असलेल्या घरातून पकडण्यात आला. यामध्ये रुखसाना अलमगीर मंडल, अलमगीर अरबी मंडल (दोन्ही रा.रावतळे, मतेवाडी, चिपळूण) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
गेल्या दहा वर्षापासून हे बांगलादेशी नागरिक चिपळूण मध्ये वास्तव्य करत असल्याची घटना उघडकीस आली. या बांगलादेशी नागरिकांकडे बोगस आधार कार्ड मिळून आल्याने काही स्थानिकच यांना येथे राहण्यासाठी मदत करत असल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले. त्यामुळे त्यांना मदत करणाऱ्या आणि यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या वर कारवाई करावी आणि येथील अजून कुठे बांगलादेशी नागरिक राहत असतील तर त्यांना शोधून काढावे अशी आशा सर्वसामान्य चिपळूणकर व्यक्त करत आहेत. तर चिपळूण पोलिसांच्या या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.