मुंबई – कोकणातील गणेशोत्सवाची लगबग ही सर्वांच्या परिचयाची आहेच. त्याच पार्श्वभूमीवर गणोशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावरहोणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी करावी लागते कसरत
मुंबईत स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासीयांची लगबग सुरु असते. रेल्वे आणि एसटीचे सहा महिने आधी बुकिंग बरेच जण करतात. त्यामुळे एसटी आणि रेल्वेचं आयत्यावेळी बुकिंग मिळणं हे कठिण होऊन होतं. त्यामुळे कोकणवासीयांसाठी कोकणात जाणं सुलभ व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूर मार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर मार्गी गेल्यास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इतर टोल नाक्यांवरील 600 ते 700 रुपयांचा टोल माफ होणार आहे. यासाठी मुंबई शहरासोबत पालघर येथील नागरिकांना जवळच्या पोलीस स्थानकातून आरटीओकडून पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.