राजापुर – दोघी एकाच वाडीतील ,दोघी चांगल्या मैत्रिणी ,मात्र मैत्रिणीचा जीव वाचवताना स्वतःचा जीव तीने गमावला या घटनेने सध्या संपूर्ण राजापूर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील जमीन जुमल्याच्या भावकीतील वादात २२ वर्षीय तरुणीचा बळी गेला. ही घटना राजापूर तालुक्यातील भालवली येथे घडली. यातील हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील हल्ला झालेली दुसरी तरुणीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिध्दि संजय गुरव (२२) आणि साक्षी मुकुंद गुरव (२१) या दोघी भालवली वरची गुरववाडी येथील रहिवासी असून भालावली सिनियर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर ११ वाजता नेहमीप्रमाणे दोघी नेहमीच्याच पण आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर विनायक शंकर गुरव (५५, रा. वरची गुरववाडी) हा दबा धरून बसला होता. त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. यात घाबरून गेलेल्या आपल्या मैत्रिणीला म्हणजे सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. हे पाहताच हल्लेखोराने आपला मोर्चा साक्षीकडे वळवला विनायकने आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. तिचा गळा आवळला. याच दरम्यान सिद्धीने तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांनी माहिती दिली आणि घटना स्थळी धाव घेतली. या हल्ल्यात साक्षी जागीच गतप्राण झाली होती. तर सिधी गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तोथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी येथे हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान सिद्धीने माहिती दिल्यानंतर नाटे पोलिसांनी विनायकचा पाठलाग करत त्याला तत्काळ ताब्यात घेतले. मात्र या मोठ्यांच्या वादात एका निष्पाप युवतीचा हकनाक बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.