चिपळूण – चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या महोत्सवाबद्दल सविस्तर चर्चा करून उद्घाटन करण्याची विनंती केली होती. या ना. उदय सामंत यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाला येण्यास संमती दिली आहे. अशी माहिती महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढील महिन्यात, रविवार दिनांक ५ फेबुंवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचा हस्ते पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. ५ रोजी उद्घाटननापूर्वी सकाळी ८ वाजता चिपळूण शहरात कोकणातील विविध कलाकार, नागरिक व विद्यार्थ्यांची शोभायात्रा निघणार आहे. महोत्सवाच्या मंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नटराज आणि श्रीदेवी विंध्यवासिनीच्या मूर्तींचे पूजन करून उद्घाटन होणार आहे. तालुक्यातील शिरगावचे शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी या मूर्ती साकारलेल्या असून महोत्सवानंतर त्या वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत रोज सायंकाळी ६ ते १० या वेळात कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. खाद्य महोत्सवांतर्गत मैदानात विविध कोकणी शाकाहारी मांसाहारी पदार्थांचे तीस स्टाल्स उपलब्ध असणार आहेत. यानिमित्ताने ‘शाश्वत पर्यटन’ या विषयावर मान्यवर अभ्यासकांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. कोकणच्या खाद्य संस्कृतीवरील मुलाखत, लोककलांच्या विश्वावरील चर्चासत्रे आणि विविध क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार हे महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. चार दिवसांतील रोजची सायंकाळ ही विविध लोककलांच्या दर्शनाने सुरु होईल.
‘लोटिस्मा’ने उभारलेल्या व्यक्तीचित्र कलादालनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी अशी इच्छा पालकमंत्र्यांनी व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असून ते कलादालनाला भेट देणार आहेत. पालकमंत्र्यांनी हा महोत्सव भव्य प्रमाणात व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाने वातावरण निर्माण झाले आहे. दहा वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही ना. सामंत यांनी भरभरून सहकार्य केले होते. आता हा महोत्सवही त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल अशा भावना महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली.
यावेळी महोत्सवाचे समन्वयक प्रकाश देशपांडे,डॉ. यतीन जाधव, प्रा. संतोष गोनबरे, धीरज वाटेकर आदी उपस्थित होते.