चिपळूण- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे. यामुळे पहाटे १ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रात्री धावणाऱ्या महत्वाच्या सहा एक्सप्रेससह सर्वच गाड्या चार ते पाच तास रखडल्या आहेत. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
वेरावल- त्रिवेंद्रम एक्सप्रेसही 4 तास 24 मिनिटं उशिरा आहे. कोकणकन्या एक्सप्रेस 3 तास 30 मिनिटं उशिरा असून ही गाडी वीर स्थानकात थांबवली आहे. सावंतवाडी एक्सप्रेस गेल्या तीन तासापासून करंजाडी स्थानकात थांबली आहे. एलटीटी मडगाव एक्सप्रेस साडेतीन तासापासून सापेवामने स्थानकात थांबवण्यात आली आहे.
सिएसटीएम-मेंगलोर एक्सप्रेस साडेपाच तासापासून दिवाणखवटी स्थानकात थांबवली आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस साडेचार तासांपासून सापेवामणे स्थानकात थांबवण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. सर्व एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवासी रात्रभर विविध स्थानकात अडकून पडले.