गुहागर – गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आलेल्या शृंगारतळीची सध्याची अवस्था बिकट झाली आहे. येथील गटारांमध्ये मासळीची घाण तर अनेक हॉटेल इमारतींच्या मागे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येत असल्याने शृंगारतळी ही कचऱ्याची तळी बनली असल्याचे बोलले जात आहे.
कचऱ्याच्या ठिकाणी दुर्गंधी मारत असल्याने शृंगारतळीतील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शृंगारतळीत मासळी मार्केटची व्यवस्था आहे. ग्रामपंचायतींने प्रशस्त मच्छी मार्केट बांधलेले आहे. तरीसुध्दा अनेक मच्छी विक्रेते येथील हक्काची जागा सोडून नाक्यानाक्यांवर बसलेल्या दिसून येतात. मासळीचे पाणी जवळच्या नाल्यात टाकतात व मासळीची घाण वेळंब पुलाजवळील एका नाल्यात टाकतात. हा रहदारीचा परिसर असून लोकवस्तीही येथे आहे. येथे नेहमी दुर्गंधी येत असल्याचे येथील नागरिक सांगतात. बाजारपेठेतील अनेक हॉटेल इमारतींच्या मागे कचऱ्याचे ढीग व्यवसायिक स्वतः या कचऱ्याची विल्हेवाट लावतात. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीची कचरा उचलणारी घंटागाडी नेहमी शृंगारतळीतून फिरताना दिसते. अनेक जण कचरा गाडीत आणून टाकतात असे असताना अनेक दुकानांच्या मागे अस्ताव्यस्त कचरा पडलेला असतो असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच मासळी विक्रेते मासळीची घाण कचरा डेपो ठिकाणी न टाकता एखाद्या गटारात टाकून मोकळे होतात. दरम्यान, ग्रामपंचायतीने वारंवार अशा मच्छी विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे. तरीसुध्दा ग्रामपंचायतीला न जुमानता मच्छी विक्रेत्या नाक्यांवर, बस थांब्यावर ठाण मांडलेल्या दिसून येतात. सरपंचांसह सर्व सदस्य या मच्छिमारांना वारंवार सूचना देत असतात. मात्र, यांच्या सूचनाना न जुमानता पुन्हा तेथेच त्या दिसून येतात. अशा मच्छी विक्रेत्यांमुळे बस थांब्यावर बसची वाट पाहणारे प्रवासीवर्ग, व्यापारी, नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.