गुहागर – गुहागर तालुक्यातील सर्वात नावाजलेली अशी वेळंब ग्रामपंचायत अखेर बिनविरोध झाल्याने अनेकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. समिक्षा स्वप्निल बारगोडे यांची निवड झाली असून एकूण नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
वेळंब ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र यावेळी गाव पातळीवर सर्वच पक्षांनी एकत्र येत कोणत्याही पक्षाचा लेबल न लावता बिनविरोध करण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे गावातील प्रत्येक वाडी वाडीत बैठक घेऊन गावातील तीन वॉर्डमधील पुढील सदस्य श्वेता घाडे, वैष्णवी घाडे, परशुराम घाडे, प्रमोद राणे, श्रीकांत मोरे, प्रगती माळी, प्रिया जाधव, सुरेश जाधव, जयश्री जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र सरपंच पदासाठी चुरस असताना अखेर या गावचे पोलीस पाटील स्वप्निल बारगोडे यांनी जे समाजकार्य केले आणि त्यांच्या या समाजकार्यात त्यांच्या पत्नीने जी त्यांना साथ दिली आहे. त्याची पोचपावती म्हणून सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गावाने माझ्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असे नवनिर्वाचित सरपंच समीक्षा बारगोडे यांनी सांगितले.
गावच्या सरपंचपदाची होणारी निवडणूक टाळावी, गावचा विकास व्हावा, यासाठी मी सरपंच पदाच्या निवडणुकीतून माझा फॉर्म मागे घेऊन गावच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माझे योगदान दिले… समृद्धी गुहागरकर