चिपळूण – गोरगरिबांसह सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी आधार बनलेल्या कामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयातून रुग्णांना चक्क फुटक्या खराब अवस्थेतील गोळ्याचे वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेफिरीमुळे हा प्रकार घडत असून त्यातून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. काही रुग्णांच्या तक्रारी आणि रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या बाह्य डॉक्टरांनी माहिती देताच वैद्यकीय अधिक्षकांनी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधत ती खराब औषधे बदलून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असणाऱ्या एका शासकीय रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नवीन कोऱ्या औषधांच्या पॅकेटमध्ये एवढ्या गोळ्या फुटल्याच कशा आणि त्याची तपासणी न करताच रुग्णांना वाटप कशा केल्या असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथे असलेल्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात कायम रुग्णांची गर्दी असते. अन्य खाजगी रुग्णालयात महागडे उपचार परवडत नसल्याने हे रुग्णालय गरजू आणि गरिबांसाठी एक मोठा आधार ठरला आहे. वेळप्रसंगी गुहागर, चिपळूण, खेड तालुक्यातील रुग्णसुद्धा येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. ओपीडीसाठी देखील शंभर दिडशे रुग्ण येथे दररोज येतात. कोरोना कालावधीत कामथे कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळाल्यानंतर तेथे विविध सेवा सुविधा पुरवण्यात आल्या. स्वतंत्र कोविड सेंटर असून ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर सिस्टीम व अन्य यंत्रणा उपलब्ध केली आहे. याशिवाय रक्त, लघवी तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरु केल्याने येथे रुग्णांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तितकाच औषध पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून महिन्यातून दोनदा औषध पुरवठा केला जातो.ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, सर्पदंश, विंचू दंश, प्रसुती व अपघातग्रस्त रुग्णांवर येथे उपचार केले जातात. त्यासाठी लागणारा पुरेसा औषधसाठी येथे केला जातो. परंतु आता याच औषधांमधील काही गोळ्यांचे पॅकेटस खराब झाले असूनही ते रुग्णांना वाटप केले जात असल्याचा भयानक प्रकार पुढे आला आहे. काही रुग्णांकडून तशा प्रकारची ओरड केली जात आहे. या रुग्णालयात फार्मासिस्ट पद असतानाही अशा पद्धतीने रुग्णांना खराब औषधे पुरविले जात असतील, तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षात या गोळ्यांच्या पॅकेटवर महाराष्ट्र शासनाकडून पुरवठा झाल्याचा शिक्का आहे. औषधांची मुदत देखील २०२४ पर्यंत आहे. असे असतानाही आतमध्ये फुटलेल्या गोळ्या असल्याने रुग्णांमध्ये अनेक गैरसमज पसरु लागले आहेत. त्यामुळे या गोळ्यांचा दर्जा तपासून घेण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.नवीन औषधांचा पुरवठा करण्याची मागणीकामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयातून देण्यात आलेल्या गोळ्या फुटलेल्या असल्याची तक्रार काही रुग्णांनी आमच्याकडेही केली आहे. त्यानुसार औषधालयात तपासणी केली असता निम्मे पॅकेट त्यापद्धतीचे आढळले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयाला पत्र देऊन त्याची माहिती देण्यात आली आहे. नव्याने औषध पुरवठा करण्याची मागणीही केली आहे. -डॉ. असिद नरवणे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, कामथे उपजिल्हा रुग्णालय.हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळगेलेदोन ते तीन महिने कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडून मी कोलेस्ट्रॉलवरती औषधे घेत आहे. मात्र त्याचा काहीच परिणाम जाणवत नाही. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या औषधांच्या पॅकेटमधील बऱ्याचशा गोळ्या तुटल्या आहेत. हातात घेताच त्यांचा चुरा होतो. त्या खायच्या कशा? असा प्रश्न पडतोच, शिवाय त्याने जर का रिॲक्शन झाले, तर करायचे काय? माझ्या माहितीनुसार अनेकांना तशा प्रकारच्या गोळ्यांचे वाटप झाले आहे. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असून रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचेच दिसून येत आहे.-श्री. मिर्लेकर, रुग्ण, चिपळूण.