रत्नागिरी – नगरपंचायत निवडणुकीनंतर विहित कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या १४ उमेदवारांना पुढील ३ वर्षांसाठी अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिले आहेत.
नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यावर ३० दिवसाच्या आत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्च व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा असतो; मात्र या उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च व शपथपत्र सादर केले नाही. त्यानंतर या उमेदवारांना खुलासा करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस देऊन त्यासाठी सुनावणीही आयोजित केली होती; मात्र नोटीस मिळाल्यावर या उमेदवारांनी खुलासाही सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र नगर पालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१ ड) (ब) नुसार या १४ उमेदवारांना ३ वर्षासाठी अपात्र घोषित केले आहे; मात्र हे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झालेले असल्याने नगरपंचायतीमधील एकही पद रिक्त होणार नाही.