खेड – एस टी कर्मचाऱ्यांच्या संपातुन हळू हळू पूर्वपदावर येणाऱ्या एस टी ला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रत्नागिरी येथील टायर प्लान्ट ला रबर पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रबर चा पुरवठा न झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि रायगड विभागातील शेकडो गाड्या टायर अभावी उभ्या राहिल्या आहेत. याचा फटका शाळेतील विध्यार्थी, नोकरदार वर्गाला बसत असून ग्रामीण भागातील एस टी चे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. रत्नागिरी येथील टायर प्लांट मधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग , रायगड विभागाला टायर रिमोल्ड करून पुरवले जातात. सद्या पावसाळा सूरु झाल्याने अनेक गाड्यांचे टायर हे रिमोल्ड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सदर गाडी वाहतुकीला पाठवणे योग्य नसल्याने रत्नागिरी विभागातील प्रत्येक आगारात १०/२० गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील फेऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द होत असल्याचा फटका एस टी च्या उत्पन्नाला बसत आहे. सद्या रत्नागिरी विभागाला २००० टायर, सिंधुदुर्ग विभागाला १००० टायर, तर रायगड विभागाला १००० टायर ची आवश्यकता आहे. मात्र टायर रिमोल्ड साठी लागणाऱ्या रबर चा पुरवठा करणाऱ्या कंपनी कडून होणाऱ्या दिरंगाईचा फटका एस टी ला बसत आहे. याबाबत रत्नागिरी चे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री ना. अनिलजी परब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रबर पुरवठा तात्काळ करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.