चिपळुण ; महामार्गाची नवीन गटारे ढासळली! ठिकठिकाणी गेले तडे; स्लॅब कोसळून स्टील बाहेर

0
45
बातम्या शेअर करा

चिपळूण – गेली कित्येक वर्षे रडत-रखडत सुरु असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत आता शंका निर्माण झाली आहे. या चौपदरीकरण कामांतर्गत करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली गटारे महामार्गाच्या कामे मार्गी लागण्यापुर्वीच ढासळू लागली आहेत.

अनेक ठिकाणी या गटारांना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी स्लॅब कोसळून त्यातील स्टील बाहेर पडले आहे. येत्या काही दिवसातच पावसाळा सुरु होईल. महामार्गाची अनेक कामे सुरु आहेत. तरीही या ढासळलेल्या गटारांच्या डागडुजीकडे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग व संबंधित ठेकेदाराने लक्ष न दिल्याने नागरिकांसह वाहन धारकांसाठी ती धोकादायक ठरत आहेत. याशिवाय पावसाळ्यात डोंगर भागातून येणारे दगड-माती थेट या गटारांमध्ये शिरुन ही गटारेही तुडुंब होणार आहेत. चिपळूण शहरात पाग पॉवर हाऊस ते बहादूरशेखनाका दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. याचवेळी सुमारे १.८० किलो मीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे काम दे‌खील जोशात सुरु आहे. आतापर्यंत पुलाचे ८ खांब उभारण्याचे काम सुरु आहे. तसेच पुढील टप्प्यात खोदाईचे कामदेखील सुरु ठेवले आहे. आता पावसाला सुरुवात होणार असल्याने या कामाचा वेग मंदावणार असला तरी सातत्यपुर्ण काम सुरुच ठेवण्याचा निर्णय ठेकेदार ईगल कंपनीकडून घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे यंत्रणा येथे दाखल केली आहे. परंतु काही ठिकाणी अतिशय घाईघ‌ाईने काँक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने दर्जाविषयी ओरड केली जात आहे. गेल्या काही वर्षापासून चौपदरीकरणातील गटारांचा मुद्दा वादग्रस्त बनला आहे. केवळ महामार्गावरील पाणी वाहून जाईल इतकीच व्यवस्था चौपदीकरणात केली जात आहे. परंतु त्या-त्या परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठीची पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अनेक नागरी वस्त्यांमधील पाणी रस्त्यावर वाहून येण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका बसणार आहे. त्यातच आता चौपदरीकरणातील गटारांना तडे गेले आहेत. तर काही ठिकाणी स्लॅब कोसळून गटारांचा मार्गच बंद झाला आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून गटारांच्या निकृष्ट कामाचा मुद्दा गाजत आहे. परंतु आजतगायत संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात गटाराच्या कामासाठी स्टीलचा वापर देखील कमी केल्याची तक्रार उघडपणे केली जात आहे. पावसाला सुरवात होण्यापुर्वीच ही गटारे अनेक ठिकाणी माती पडून भरलेल्या स्थितीत आहेत. मात्र ठेकेदार कंपनीकडून त्याकडे फारशे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here