गुहागर – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे.
महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक: मराअ-२०२१/प्र.क्र.३४ /म-५ दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ नुसार सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार फेरफार लोक आदालतीचे आयोजन गुहागरात उद्या ८ जून रोजी बुधवारी करण्यात आले आहे. हे नियोजन मंडळ मुख्यालयात होणार आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडुन या लोकाभिमुख उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर आदेशान्वये गुहागर तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या एकूण ६ महसूल मंडळांच्या ठिकाणी म्हणजेच गुहागर,पालशेत,आबलोली,हेदवी,पाटपन्हाळे,तळवली या मंडळांच्या ठिकाणी हे अभियान राबविले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या फेरफार अदालतीमध्ये एक महिन्यांच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणेत येणार आहेत. तरी सर्वसामान्य जनतेने त्यांचे जमीनीबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण करणेकरिता फेरफार अदालतीमध्ये अर्ज करावेत. प्रामुख्याने वारस तपासाचे काम, बोजा नोंदी घालणे व कमी करणे, तगाई बोजे कमी करणे, तसेच कर्ज प्रकरणी बँकेने अथवा वसुली अधिकारी यांनी कर्ज माफ केले असल्यास त्याबददलचे शेरे कमी करणे, सातबारामधील किरकोळ स्वरुपातील भोगवटादाराचे नांवातील तफावत दूर करणे/दुरुस्त करणे, हक्कसोड पत्र, बक्षिसपत्र यांसारखे नोंदणीकृत दस्तऐवजांची नोंद करणे वगैरे प्रकारची कामे केली जाणार आहेत. सदर अभियानामध्ये सुमारे १ महिन्यांच्या कालावधीमध्ये वरीलप्रकारची कामे अर्ज स्विकारुन त्यावर तात्काळ कार्यवाही करुन निर्गत करणेचे कामकाज केले जाणार आहे. तरी या योजनेचा सर्वसामान्य जनतेने अधिकाधिक लाभ घ्यावा व शासनाच्या या उपक्रमास सहकार्य असे आवाहन गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.