गेल्या ८ वर्षात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेतील मतदारांनी काय कमावले ? – निलेश राणे

0
44
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – गुरुवारी २३ मे २०२२ रोजी लोकसभेचा ८ वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खा. विनायक राऊत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला आहे. यावेळी लोकसभेतील मतदारांनी जागरूक राहावे अन्यथा मतदारसंघातील भयावह परिस्थितीमुळे कोकणाला मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात स्थानिक खासदार म्हणून निवडून येऊन विनायक राऊत यांना ८ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले याचे ऑडिट व्हायला हवं असं निलेश राणे यांनी सांगतानाच कोणतेही उल्लेखनीय कार्य या मतदार संघात घडलेले नाही यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्थानिक खासदारांनी मतदारसंघात कोणतेही कारखाने, उद्योग आणले नाहीत, या काळात कोणतीही रोजगारनिर्मिती झाली नाही. कोकण रेल्वेच्या प्रलंबित अनेक प्रश्नांपैकी एकही प्रश्नाला ते न्याय देऊ शकले नाहीत. डबल ट्रॅक, टर्मिनस, नवे स्टेशन सुद्धा देऊ शकले नाहीत. स्वतःच्या पुढाकाराने ना एक डबा वाढवला ना कुठली ट्रेन वाढवली. कोकण रेल्वेचे सगळे प्रश्न जैसे थे आहेत.

मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्नही तसाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले पण रत्नागिरीमध्ये पूर्ण झालेला नाही. तर दुसरीकडे एकाच रस्त्याचे उदघाटन तीन वेळा हे खासदार करतात. यामुळेच मतदार संघ भयानक परिस्थितीमध्ये आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना काळात स्वतः पुढाकार घेऊन एकही कोरोना सेंटर त्यांनी बांधले नाही. दोन वेळा केवळ मोदी लाटेत निवडून आलेला हा खासदार आहे अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

ते पुढे म्हणतात, मतदार संघातील हि भयावह परिस्थिती बदलली नाही तर कोकणाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे इथल्या सुज्ञ नागरिक, मतदारांनी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here