गुहागर – गुहागर – विजापूर रस्ता रुंदीकरणात रामपूर ते गुहागर अर्धवट राहिलेल्या कामांना मूर्तरूप आलेले दिसत आहे. पुलांवरील जोडरस्ते तयार करण्याचे काम सुरु असून त्याला डांबरीकरणाचा मुलामा देण्यात येत आहे.
गुहागर – विजापूर रस्ता रुंदीकरणात पूल व मोऱ्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र रस्ता रुंदीकरणामुळे हि कामे धीम्या गतीने सुरु होती. पुलाचे बांधकाम झालेले असले तरी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाला जोडणारे तात्पुरते जोडरस्ते करण्यात आले. केवळ मातीचा भराव टाकून हे जोडरस्ते केल्याने खड्डे पडणे, रस्ता निसरडा होणे असे प्रकार गेल्या पावसाळ्यापासून वाहनचालक व प्रवाशांना अनुभवायला मिळाले. पुलांना योग्य त्या पद्धतीने रस्ते न जोडल्याने वाहने आदळण्याचे प्रकार सुरु होते. आता अशा ठिकाणी कायमस्वरूपी डांबर टाकून तेवढा भाग समांतर करण्याचे काम सुरु झाले आहे. ज्या ठिकाणी गटारांची कामे अर्धवट आहेत अशा ठिकाणी कामे सुरु आहेत. पावसाळ्यात वाहन चालक व प्रवाश्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महामार्ग अधिकाऱ्यांकडून हि कामे हाती घेण्यात आली आहेत.
दरम्यान, गेली ३ वर्षे गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरण धीम्या गतीनेच सुरु आहे. अजूनही कित्येक ठिकाणची पुलांची कामे होणे आहेत. रुंदीकरणात सार्वजनिक ठिकाणे तोडण्यात आली ती अद्याप उभारण्यात आलेली नाहीत. वेळंब फाट्यावरील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने बांधलेले स्वच्छतागृह रुंदीकरणात तोडण्यात आले मात्र, अद्याप ते महामार्ग अधिकारी व ठेकेदाराने बांधून दिलेले नाही. शृंगारतळीचा बसथांबा बांधलेला नाही. रस्त्यालगतच्या भूमीगत जलवाहिन्या काढून टाकण्यात आल्या त्याही दुरुस्त करुन देण्यात आल्या नाहीत. ठिकठिकाणी मातीचे ढीग तसेच जागेवर आहेत. जुन्या मोऱ्या काढलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत तशाच पडून आहेत. शृंगारतळीतील स्मशानभूमी कंपाऊंड तोडण्यात आले मात्र, तेही दुरुस्त करण्यात आलेले नाही. पाटपन्हाळे येथील गणेश विसर्जन घाट उध्वस्त करण्यात आला तोही बांधून देण्यात आलेला नाही. एकंदरीत रस्ता रुंदीकरणात कामाचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. रस्ता रुंदीकरण करताना ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधींनी ही कामे सुरळीत करुन देण्याची आश्वासने दिली होती मात्र, अद्यापही या आश्वासनांना बगल देण्यात आल्याचे समोर येत आहे.