गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत या प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकसनशील असणाऱ्या समुद्रकिनारा-याची गाज रिसॉर्टच्या माध्यमातुन स्वच्छता करण्यात आली.
गुहागर तालुक्यातील पालशेत हे ठिकाण प्राचीन काळापासुन समुद्र किनाऱ्या लगतचे प्रसिद्ध बंदर आहे.या पालशेत गावामध्येच श्री. दत्तभक्त श्रीमान बाळोजी फकीरजी सुर्वे यांनी दत्त मंदिराची निर्मिती केली आणि पालशेत हे गाव एक धार्मिक स्थळ म्हणुन ओळखले जावु लागले. बदलत्या काळानुसार या गावची भौगोलिक परिस्थिती, नारळी – पोफळी, आंबा-काजूच्या बागा, आकर्षित करणारा समुद्रकिनारा यामुळे पर्यटनदृष्ट्या पालशेत गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. प्राचीन काळाातील घरांच्या बांधणीमुळे हे गाव चित्रपट,वेब सिरीज,नियमित प्रसारीत होणा-या मालिकांच्या शुटिंगचे प्रमुख केंद्र बनले आहे. मराठी भाषेसह विविध भाषिक चित्रपटांचे, मालिकांचे शुटींग या गावात नियमितपणे चालु असते. हे सुद्धा एक रोजगार निर्मितीचे साधन आहे मात्र याकरिता अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा आजही पालशेत गावांमध्ये उपलब्ध होत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र जोशी यांनी पालशेत समुद्रकिनारी निसर्गाच्या सानिध्यात, पर्यटकांना निवासासाठी बांबुहाऊस आणि अस्सल कोकणी पद्धतीचे उत्कृष्ट जेवण देण्याच्या कल्पनेतुन गाज रिसॉर्टची निर्मिती केली. पालशेत गावी गाज रिसॉर्टमुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे मात्र हा ओघ वाढत असताना प्रमुख आकर्षणाचे केंद्र असणारा समुद्रकिनारा विवीध प्रकारचे- आकाराचे प्लास्टिक, विविध प्रकारच्या काचेच्या बाटल्या आणि अन्य कचरा यामुळे अस्वच्छ होत आहे त्याच बरोबर काचेच्या फुटलेल्या बाटल्यामुळे कीनारा धोकादायक बनत आहे. या कारणाने समुद्रकिनारा स्वच्छ होणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर समुद्र किनारा स्वच्छता मोहीम ही अन्य कोणीतरी करण्यापेक्षा आपणच करावी या हेतुने जितेंद्र जोशी यांनी गाज रिसॉर्टच्या माध्यमातुन पालशेत समुद्रकिनारा स्वतः,स्थानिक ग्रामस्थ,तालुक्यातील आपले सहकारी, हितचिंतक आणि रिसॉर्टचे कर्मचारी यांच्या सहकारातुन पालशेत समुद्रकिनारा स्वच्छ केला. स्वच्छता करण्यासाठी आलेल्या सहकाऱ्यांना गाज रिसॉर्टकडून हॅन्डग्लोज,फावडे, प्लास्टिक पिशव्या,टप असे साहित्य कचरा उचलण्यासाठी देण्यात आले तर समुद्रकिनारी खोलवर रुतलेला कचरा काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. एकदा स्वच्छता मोहीम राबवुन हा किनारा कायमचा स्वच्छ राहणार नाही याकरता वारंवार स्वच्छता मोहीम राबवण्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढणार असुन स्थानिकांच्या हाताला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेच्या वेळी गाज रिसॉर्टचे मालक स्वतः जितेंद्र जोशी, पालशेतमधील प्रसिद्ध उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी पांडुरंग विलणकर, भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे पालशेतच्या पोलीस पाटील भक्ती गद्रे, निवाशीच्या पोलीस पाटील मृणाल ताले, अद्वैत बेडेकर, नीरज सोमण, अमोघ वैद्य, विलास ओक आदीं सह गाज रिसॉर्टचे सर्व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि जितेंद्र जोशी यांचे बहुसंख्य हितचिंतक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.