गुहागर- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला दिल्याचे वृत्त आहे. मात्र मात्र याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी आणि तयारीचे नियोजन सर्वच पक्षांकडून सुरू झाले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विनय नातू यांनी देखील उत्तर रत्नागिरीत भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले. शांत व संयमी स्वभावामुळे भाजपची नाळ सामान्य जनतेपर्यंत जोडण्यासाठी नातू यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, नुकतेच माजी आमदार विनय नातू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले आहे. नातू यांनी आपल्या सोशल मिडीयावरील स्टेटसवरुन जिल्हाअध्यक्षपदाचे नाव हटवले असून केवळ माजी आमदार असे ठेवल्याने यामध्ये काही तथ्य असावे असा अंदाज आहे .
याबाबत माजी आमदार विनय नातू यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. मात्र असे असले तरी आमदार विनय नातू यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मात्र गुहागर सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.