चिपळूण – देवस्थान, खोत आणि कुळ यांच्यातील नुकसान भरपाई वादामुळे रखडलेले मुंबई -गोवा मार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पोलीस बंदोबस्त घेवून सुरु करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना दिले आहेत. त्यामुळे धोकादायक झालेल्या परशुराम घाटाचे काम येत्या काळात सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिपळूण येथील ओवेस पेचकर यांनी या रखडलेल्या कामाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्ष सुरू आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत येणार्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण होत आहे. मात्र चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत येणार्या अवघड परशुराम घाटाच्या कामाला अद्याप सुरूवातही झालेली नाही. चौपदरीकरणाच्या कामासाठी जी जागा संपादित करण्यात आली, त्यासाठी ४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. यावरून पेढे-परशुराम येथील ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.