गुहागर- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील मच्छी व्यावसायिक यांची मच्छिमारी करणारी बोट चार खलाशी व दोन तांडेल घेऊन २६ ऑक्टोबर रोजी मासेमारीकरिता खोल समुद्रात गेले असून ती अद्याप परत आलेली नाही.
जयगड पोलीस ठाण्यात मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर (वय ४३) रा. जयगड यांनी जयगड पोलीसा ठाण्यामध्ये द्दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे कि, त्यांच्या मालकीची नौका नवेद – २ क्र. IND – MH4 – MM 3555 ही मत्सव्यवसाय आयुक्ताकडे नोंद केलेली बोट २६ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ५.०० वाजता समुद्रात मासेमारी करण्याकरीता गेली होती. या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे सर्व राहणार गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवाशी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू )असे सहाही खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील आहेत. हे सर्वजण दिनांक २६ ऑक्टोबर रोजी मच्छिमारीसाठी गेले होते. या बोटीचा ठावठिकाणा लागण्यासाठी याच मालकाच्या दुसऱ्या बोटीच्या वायरलेसवरून खलाशांशी संपर्क साधला असता आम्ही आता दाभोळच्या उपर आहे असे सांगितले गेले. मात्र त्यानंतर या बोटीशी कोणताही संपर्क झालेला नाही असे बोट मालक मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या घटनेला चार दिवस होवून गेले असून या बोटीचा व त्यावरील खलाशांचा कसल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. तरी या बोटीचा व त्यावरील खलाशांचा शोध घेण्यात यावा अशी विनंती या जबाबात केली आहे. या घटनेची नोंद जयगड सागरी पोलीस ठाणे येथे रजि.१६/२०२१ स्टे.डा. नं. ३०२/२०२१ नुसार करण्यात आली आहे. या नौकेचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस, स्थानिक मच्छिमार, कोस्टगार्ड , नौका विभाग रत्नागिरी हे घेत असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसवरून या नौकेची माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती जयगड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. केळकर यांनी पत्रकारांना दूरध्वनीवरून दिली.