गुहागर – निसर्गरम्य अशा गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण केलेली २२ खोके आज तोडण्यास बंदर विभागाने म सुरवात केली. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून गुहागर समुद्रकिनारी असलेली इतर अनधिकृत बांधकामे आता पाडली जाणार का याचीच चर्चा सुरू झाली आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेली खोके हटवू नये म्हणून आज सकाळ पासूनच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच गुहागरातील नागरिक कारवाई होवू नये म्हणून आटोकाट प्रयत्न सुरु होते. मात्र प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम रहात अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली.
याआधीच ही सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत अशी अंतिम नोटीस सहाय्यक बंदर निरिक्षक, पालशेत यांनी खोकेधारकांना दिली होती. त्यामुळे बंदर विभागाने नोटीसीत जाहीर केल्याप्रमाणे 12 ऑक्टोबरपासून अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली.आज सकाळी बंदर विभाग अतिक्रमण हटविणार म्हटल्यावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धावपळ सुरु केली. आपापल्या नेत्यांना संपर्क करण्यात आला. आजची कारवाई थांबवावी. अशी विनंती करण्यात आली. तर गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, युवा सेना जिल्हाधिकारी सचिन जाधव यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन विनायक उगलमुगले, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेवून कारवाई थांबविण्याची विनंती केली. मात्र प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावात न येता कारवाई करणारच अशी भूमिका घेतली. . त्यानंतर अतिक्रमण पाडण्यास सुरवात केली. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी विनायक उगलमुगले, बंदर अधिक्षक बोरगे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, महावितरण, महसुल, नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.















